पुणे – विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह शहरात रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या धो-धो पावसाने पुण्यातील रस्ते पूरसदृश झाले होते. अवघ्या अर्धा तासात शहरात 30 मिमी, तर लोहगाव परिसरात 26 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे शहरात आठ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकाड्याने पुणेकर हैराण झाले होते. दरम्यान, रात्री ढगांची दाटी होऊन आठच्या सुमारास धो-धो पावसाला सुरवात झाली. विजांचा कडकडाट, वेगवान वारा आणि धो-धो पाऊस यामुळे देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची आणि रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्यांचीही धांदल उडाली.
दरम्यान, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, पाषाण, बावधन, औंध, कात्रज, धायरी, नऱ्हे, उंड्री, धनकवडी, बिबवेवाडी, स्वारगेट, हडपसर, मगरपट्टा, फुरूसुंगी, येरवडा, विश्रांतवाडी, खराडी, बोपोडी या उपनगरातही विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले.
गणपती मंडळाच्या मांडवाभोवती पाणी साचल्याने कार्यकर्त्यांची धांदल उडाली. काही मंडळात आरती सुरू असताना पाऊस सुरू झाल्यावर भाविकांची तारांबळ उडाली. कर्वे रस्ता, खंडोजी बाबा चौक, अलका चौक, स्वारगेट यासह अन्य शहरातील सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
विसर्जनासाठी यंदा धरणातून विसर्ग नाही
अपुरा पाणीसाठा, आतापर्यंतचा अत्यल्प पाऊस लक्षात घेता यंदा गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून 0.15 टीएमसी इतके पाणी सोडण्यात येते. यंदा मात्र खडकवासला धरण सुमारे 80 टक्के भरले. तसेच टेमघर धरणही 78 टक्के भरले आहे. तसेच पावसाचा जोरही कमी आहे. त्यामुळे धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्यस्थितीत पानशेत धरणातून पॉवर हाऊसद्वारे 600 क्युसेक, तर वरसगाव धरणातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येते.
विसर्जन मिरवणुकीवरही पावसाचे सावट
शहरासह जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषत: दि. 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला काही भागात मुसळधार, तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर मुसळधार पावसाचे सावट आहे.