शशिकांत शिंदे यांचा इशारा; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मोठे प्रयत्न होत असले तरी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहणार आहे. या पक्षाने आजपर्यंत अनेकांना पदे दिली. मात्र, तरीदेखील पक्षवाढीसाठी पदाधिकारी काम करताना दिसत नाहीत. पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे पक्षाचे काम करा, अन्यथा पदे सोडा, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला. राष्ट्रवादीच्या बैठकीत दांडीबहाद्दर पदाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून काम करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा दि. 28 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने, देवराज पाटील, सुभाषराव शिंदे, डी. के. पवार, रमेश पाटील, तेजस शिंदे, कविता म्हेत्रे, समिंद्रा जाधव, सीमा जाधव, कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “”सातारचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला डळमळीत करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. निवडणूक जाहीर होईपर्यंत काही लोकांना खेचण्याचे काम होणार आहे. यातील काही अफवाही असणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. पक्षाचा काळ कठीण असला तरी अजूनही शरद पवार यांच्यावर जिल्ह्यातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत.
सर्वांनी मरगळ झटकून कामाला लागावे. जे पक्षाचे काम करत नसतील, त्यांच्याबाबत आम्ही कठोर निर्णय घेत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात अनेकांना पदे दिली. मात्र, काही पदाधिकारी पक्षाचे प्रामाणिक काम करताना दिसत नाहीत. पक्षाच्या बैठकांना उपस्थित न राहणाऱ्या पदाधिकार्यांनाही समज देण्यात येणार आहे. परिणामांचा विचार न करता प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे.” देशात आणि राज्यात सध्या भयंकर परिस्थिती आहे.सत्तेचा वापर करुन सुडाचे राजकारण करण्यात येत आहे.
विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरु आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सर्वांनी आपली ताकद दाखवून द्यायची आहे. संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला पाहिजे, असे काम करा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्यांचा विचार करणारा, शरद पवार यांना मानणारा पक्ष आहे. सध्या अफवांचे पीक सुरु असून कार्यकर्त्यांनी अशा गोष्टींवर लक्ष देऊ नये, सर्वांनी एकदिलाने पक्षाचे काम करावे, असे आवाहन मकरंद पाटील यांनी केले.
बाळासाहेब पाटील म्हणाले, “जिल्ह्यात राष्ट्रवादी फोडण्याचे विरोधकांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना टार्गेट करण्याचे काम सुरु आहे. पक्ष संघटना मजबूत असून कोणीही पक्षातून जाणार नाही.’ मुख्यमंत्र्यांनी केवळ हवाई पाहणी केली. शरद पवार यांनी पूरग्रस्त भागात मुक्काम करुन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे अजूनही जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आहे, असे दीपक चव्हाण यांनी सांगितले. राजकुमार पाटील यांनी सूत्रसंचलन केले.