पुणे – आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची मने जिंकण्याऱ्या भारतीय स्टार क्रिकेटर व डावखुरा फलंदाज युवराज सिंगने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. त्याच्या या निर्णयामुळे समस्त क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असून युवराजच्या निवृत्तीने सर्वांचे त्याच्याकडे लक्ष वेधले.
या अष्टपैलू खेळाडूने आपल्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्तम खेळी केल्या आहेत, त्याने केलेल्या खेळी क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहतील. त्यापैकीच एकदिवसीय क्रिकेटमधील युवराजच्या सर्वोत्तम 5 खेळीबदल आपण थोडक्यात माहिती घेऊया.
84 विरूध्द ऑस्ट्रेलिया ( 7 आॅक्टोबर 2002)
युवराजची त्याच्या खेळातील प्रतिभेच्या आधारे भारतीय संघात निवड झाली होती. ऑस्ट्रेलियाविरूध्दातील हा सामना त्याच्या कारकिर्दीतील दुसरा सामना होता, आणि या सामन्यातील कामगिरीनंतरच त्याची क्रिकेट जगतातील युवराज अशी ओळख झाली होती. नैरोबी येथील आयसीसीसी नाॅकआउट स्पर्धेत पहिल्या क्वार्टरफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना सचिन, गांगुली यासारखे फलंदाज अपयशी ठरले होते, तेव्हा युवराजने 80 चेंडूत 84 (12 चौकार) धावांची खेळी केली होती. या त्याच्या कामगिरीमुळे भारताने सामना जिंकला होता. या सामन्यात तो सामनावीर होता,त्यानंतरच युवराजचे शाही अंदाजात क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आणि तो प्रकाशझोतात आला.
121 विरूध्द ऑस्ट्रेलिया ( 22 जानेवारी 2004)
डीबी मालिकेतील हा सामना सिडनीत झाला होता. या सामन्यात युवराजने शतकी खेळी करत विदेशी रणभूमीवरही तो फटकेबाजी करू शकतो हे दाखवून दिले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघात ब्रेट ली आणि गिलेस्पी सारखे वेगवान गोलंदाज होते, तरी देखील युवराजने 122 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारासह 139 धावा करत विदेशी भूमीवर आपले वर्चस्व दाखवून दिले.
नाबाद 107 विरूध्द पाकिस्तान (19 फेब्रुवारी 2006)
कराचीमधील युवराजची ही खेळी त्याचे चाहते कधीच विसरणार नाहीत. भारतीय संघ या सामन्यात 287 धावांचा पाठलाग करत होता. युवराजने सामन्यात एक बाजू संभाळत धोनीसोबत एक चांगली भागिदारी केली. युवराजने 90 चेंडूत नाबाद 107 धावा करत भारतीय संघास विजय मिळवून दिला. या खेळीत युवराजने 14 षटकार मारले होते.
138 विरूध्द इंग्लंड (14 नोव्हेंबर 2008)
राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात युवराजच्या तूफानी खेळीपुढे इंग्लंडचा संघाने आपल्या डावात फलंदाजीसाठी येण्यापूर्वीच हार मानली होती. युवराजने या खेळीत धुवाधार फलंदाजी करत 78 चेंडूत 138 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 6 षटकार लगावले होते. या खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 5 बाद 387 धावा केल्या होत्या.
131 विरूध्द वेस्टइंडिज ( 26 जून 2009)
विडिंजच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे किती कठीण असते, हे क्रिकेटपटूसह साऱ्याच क्रिकेट जाणकारांना चांगले माहित आहे. अशा खेळपट्टीवर युवराजने आपली प्रतिभा दाखवत 102 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारासह 131 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 6 बाद 339 धावसंख्येपर्यत मजल मारली होती आणि भारतीय संघ हा सामना 20 धावांनी जिंकला होता.
युवराजने आपल्या कारकिर्दीत 304 एकदिवसीय सामन्यात 8,701 धावा केल्या त्यामध्ये त्याने 14 शतके व 52 अर्धशतके झळकावली. तर गोलंदाजीत 111 विकेट्स त्यांनी आपल्या नावे केल्या आहेत. त्याने नैरोबी येथे केनिया विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपले क्रिकेट पदार्पण केले होते.