नगर – शिक्षकांमुळे सुसंस्कारीत समाज घडत आहे. करोना महामारीच्या संकटात देखील शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन बाबासाहेब बोडखे यांच्यासारखे उपक्रमशील शिक्षक राबवित असलेले उपक्रम प्रेरणादायी आहे. आज देत असलेल्या शिक्षकांच्या योगदानाने उद्याचा सशक्तभारत देश घडणार असल्याची भावना शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी व्यक्त केली.
भुईकोट किल्ला मैदान येथील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक बाबासाहेब बोडखे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भावनेने स्वखर्चाने इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या स्वाध्याय व अभ्यास पुस्तिका मोफत उपलब्ध करुन दिल्या. या पुस्तिकांचे वाटप जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षण अधिकारी रामदास हराळ यांच्या हस्ते शाळेत झाले.
यावेळी संस्थेचे सचिव किशोर मुनोत, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास धीवर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका उज्वला आदिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.