उत्तर भारतीयांच्या मतासाठी BJPची ‘स्टार’ रणनीती, मुंबई महापालिका निवडणूकीत जागावाटप स्पष्ट आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘स्टार’ प्रचारकांची फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गायक-राजकारणी मनोज तिवारी, रवी किशन, निरहुआ आणि मैथिली ठाकूर यांचा समावेश असेल. उत्तर भारतीय बहुल वॉर्डांमध्ये हे नेते प्रचार करतील, तर शिवसेनेने अभिनेता शिंदे गटाने अभिनेता गोविंदाला मैदानात उतरवलेय. महायुतीमध्ये भाजप १४० तर शिंदे गट ८७ जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपने ‘मोठ्या भावाची’ भूमिका कायम ठेवलीय. जागांच्या अदलाबदलीबाबत सध्या दोन्ही पक्षांत अंतिम चर्चा सुरू असून, लवकरच उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसची आघाडी, ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर – आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असताना, काँग्रेसने उमेदवारांची घोषणा करून आघाडी घेतली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार शाहू छत्रपती महाराज व सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आलीय. या यादीत अनेक अनुभवी माजी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आलीय. सामाजिक समतोल राखत अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग आणि महिलांना प्राधान्य देण्यात आले असून, विजयाची क्षमता हा मुख्य निकष ठेवलाय. काँग्रेसच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. भीमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून 3 महिने बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे भाविकांना आवाहन श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या विकासकामांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेची कामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केलेय. १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान महाशिवरात्री उत्सवासाठी मंदिर खुले राहील, मात्र उर्वरित काळात थेट दर्शन बंद असेल. यादरम्यान श्रींची नित्य पूजा आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. बांधकाम परिसरातील सुरक्षिततेच्या कारणास्तव ग्रामस्थ आणि अधिकृत कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आलाय. बीएमसी निवडणूकीत गवळी भगिनी रिंगणात, गीता आणि योगिता गवळींनी भरला अर्ज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गँगस्टर ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या अरुण गवळी यांच्या दोन्ही मुलींनी शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. १७ वर्षांच्या कारावासानंतर नुकतेच बाहेर आलेले अरुण गवळी यांच्या ‘अखिल भारतीय सेना’ या पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवणार आहेत. गीता गवळी यांनी भायखळ्यातील प्रभाग क्रमांक २१२ मधून पुन्हा एकदा नशीब आजमावण्यासाठी अर्ज भरलाय. २०१७ मध्ये त्या याच प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. तर दुसरीकडे, त्यांची धाकटी बहीण योगिता गवळी-वाघमारे या प्रभाग क्रमांक २०७ मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून, याद्वारे गवळी कुटुंबाच्या पुढच्या पिढीचा राजकारणात प्रवेश झालाय. भायखळा आणि मध्य मुंबईत गवळी कुटुंबाचा मोठा राजकीय प्रभाव राहिलाय. मोदी सरकारने गरिबांच्या पाठीत खंजीर खुपसला, मनरेगा संपवल्याने खर्गेंचा घणाघात मोदी सरकारने ‘मनरेगा’ योजना बंद करून त्याऐवजी ‘VB-G RAM G’ कायदा लागू करणे म्हणजे गरिबांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. काँग्रेस कार्य समितीच्या (CWC) बैठकीत ते बोलत होते. खर्गे म्हणाले की, मनरेगा ही ग्रामीण भारताचा चेहरा बदलणारी जगातील सर्वात मोठी रोजगार योजना होती. मात्र, कोणत्याही अभ्यासाशिवाय किंवा राज्यांशी चर्चा न करता सरकारने हा नवा कायदा लादलाय. हे पाऊल मागे घेतलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांप्रमाणेच हुकूमशाही स्वरूपाचे आहे. या अन्यायाविरोधात देशव्यापी जनआंदोलन उभे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचा निषेध करत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहनही केले. IAS अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर SSP निलंबित, ५५ कोटींच्या टेंडर घोटाळ्याप्रकरणी कारवाई पंजाबमधील अमृतसर येथे ५५ कोटी रुपयांच्या निविदा घोटाळ्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एसएसपी लखबीर सिंह यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केलेय. एका वरिष्ठ IAS अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर गृह विभागाने ही कठोर पावले उचलली आहेत. हे संपूर्ण प्रकरण अमृतसरच्या पॉश रणजीत एव्हेन्यू भागातील ५५ कोटींच्या विकासकामांच्या निविदांशी संबंधित असून, त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि सरकारी निधीचा अपहार झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी लखबीर सिंह यांच्याकडे होती, मात्र त्यांनी कर्तव्यात कसूर आणि गंभीर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त मुख्य सचिव आलोक शेखर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या घोटाळ्यातील आर्थिक अनियमितता आणि इतर पडद्यामागच्या सुत्रधारांचा शोध आता अधिक तीव्र करण्यात आलाय. सोने-चांदीनंतर आता तांब्याचा दरारा, बाजारात मोठी तेजी येण्याचे संकेत चालू वर्षात सोने आणि चांदीच्या दरांनी गुंतवणुकीवर भरघोस परतावा दिला असतानाच आता ‘तांबे’ (कॉपर) बाजाराचा नवा राजा बनण्यास सज्ज झालेय. या वर्षात तांब्याच्या किमतीत ३५ टक्क्यांहून अधिक मोठी वाढ झाली असून, बाजार विश्लेषकांच्या मते ही केवळ सुरुवात आहे. वाढत्या औद्योगिक मागणीमुळे चांदीच्या किमती ज्याप्रमाणे वधारल्या आहेत, तसेच काहीसे चित्र तांब्याबाबत दिसतेय. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्राचा विस्तार आणि डेटा सेंटर्सच्या उभारणीत तांब्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. या तुलनेत बाजारात तांब्याचा पुरवठा मात्र मर्यादित आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, आगामी काळात तांब्याचा पुरवठा १.५ लाख टनांनी कमी पडण्याची शक्यता आहे. वीज यंत्रणांचे आधुनिकीकरण आणि वाढती जागतिक मागणी पाहता, भविष्यात तांब्याचे दर गगनाला भिडतील आणि गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. 2.15 फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात होणार मोठी वाढ , 8 वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ८ व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आता संपताना दिसतेय. तसेच जर सरकारने फिटमेंट फॅक्टर २.१५ निश्चित केला, तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार थेट दुप्पट होऊ शकतो. १ जानेवारी २०२६ पासून हा बदल लागू होण्याची शक्यता आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान मूळ पगार १८,००० रुपये आहे, तो २.१५ च्या पटीत वाढून ३८,७०० रुपये होईल. तसेच, ५०,००० रुपये मूळ पगार असणाऱ्यांचा पगार १,०७,५०० रुपयांवर पोहोचेल. या वाढीमुळे केवळ पगारच नाही, तर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि पेन्शनमध्येही मोठी वाढ होणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा बाकी असली, तरी या संभाव्य निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल, ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरण दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेय. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या घटनेत अल्लू अर्जुनसह थिएटर मालक आणि सुरक्षारक्षकांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही अभिनेता तेथे पोहोचल्याने गर्दी अनियंत्रित झाल्याचा आरोप आहे. तसेच, खासगी बाउन्सरच्या वर्तणुकीमुळे गोंधळ वाढल्याचे तपासात समोर आलेय. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, या कारवाईमुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडालीय. विराट कोहलीचा खिलाडूपणा, स्वतःला बाद करणाऱ्या गोलंदाजाला दिले गिफ्ट विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मध्ये दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने आपल्या खेळासोबतच दिलदारपणाने चाहत्यांची मने जिंकलीत. गुजरातविरुद्धच्या सामन्यात विराट ७७ धावांवर असताना युवा फिरकीपटू विशाल जैस्वालने त्याला यष्टीचीत करून बाद केले. एका दिग्गज फलंदाजाला बाद केल्याचा आनंद विशालच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विराटनेही मैदानातील आक्रमकता बाजूला ठेवून सामना संपल्यानंतर विशालला बोलावले आणि ज्या चेंडूवर तो बाद झाला, त्याच ‘मॅच बॉल’वर स्वाक्षरी करून त्याला भेट दिला. विशालने हा भावूक क्षण सोशल मीडियावर शेअर करत विराटाचे आभार मानले आहेत. स्टार खेळाडूची ही प्रोत्साहन देण्याची वृत्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.