पुणे – शहरात करोनाबाधितांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर महापालिकेने शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनची मुदत गुरुवारी रात्री 12 वाजता संपत आहे. त्यामुळे शहरात शुक्रवारपासून कशा प्रकारे लॉकडाऊन शिथिल होईल, याचा निर्णय महापालिकेकडून संध्याकाळपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काय नियम असावेत, याबाबत शहरातील व्यापारी संघटनांनी महापालिकेस तसेच जिल्हा प्रशासनासही निवेदन दिले असून त्यातील किती मागण्यांचा महापालिका सकारात्मक विचार करणार, याबाबत उत्सुकता आहे.
शहरात दुसरे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पहिले पाच दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून अत्यावश्यक सेवांमध्ये दूध, किराणा तसेच भाजीपाला विक्रीस सकाळी 8 ते 12 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, हे लॉकडाऊन संपत आल्याने पालिकेस शुक्रवारपासून शहरात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार हे महापालिकेस निश्चित करावे लागणार आहे.
तसेच शहरातील करोनांच्या नवीन बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरात अनावश्यक गर्दी होणार नाही याचीही खबरदारी घेऊन आठवडयात काही दिवस शहरात कडक लॉकडाऊन ठेवावे लागणार आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही यापुढे शहरात लॉकडाऊन असणार नाही. मात्र, गर्दी नियंत्रण आणि लॉकडाऊनचे नियम कडकपणे राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाऊनचे भवितव्य आज महापालिकाच ठरविणार आहे.