मुंबई – राज्यात करोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी एकाच दिवसात तब्बल 10 हजार 576 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा हा पहिलाच दिवस आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12 हजार 556वर पोहोचला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले 1,36,980 रुग्ण आहेत.
एकीकडे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 576 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे, तर 280 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5552 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आले.
लॉकडाउननंतर करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा इतर शहरांमधला संसर्ग वाढला. आता सर्वाधिक रुग्णवाढ पुणे जिल्ह्यात होते आहे. पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही करोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर करोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1 लाख 87 हजार 769 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
दरम्यान, सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्याला पुण्याने या बाबतीत मागे टाकले आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मुंबईत मोठे आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.