मराठी नाट्यपरंपरेचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 1818/1819 मध्ये झाला असावा. ते मराठी नाटककार होते. त्यांचा उल्लेख “महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी’ असाही केला जातो. विष्णूदास भावे हे स्वतः सिद्धहस्त हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या.
त्यांचे वडील अमृत भावे हे सांगलीचे संस्थानिक राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या दरबारात लष्करी हुद्द्यावर होते. पटवर्धन राजे कलाप्रेमी होते. त्यांनी एकदा कर्नाटकातील करकी या गावातील भागवतमेळा हा यक्षगानाचा प्रकार वर्ष 1942 मध्ये दरबारात आयोजिला होता. हा कार्यक्रम पहाताना राजांनाही वाटले की, आपल्या इथेही अशी कला सादर व्हावी. मग कोण प्रयत्न करणार बरे?
राजांना अमृत भावेंचा मुलगा विष्णुदास यांच्या छंदाबाबत कल्पना असावी कारण तरुण विष्णू चित्रकला, शिल्पकलेबरोबरच कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत असे. राजांनी विष्णूला पाचारण केले व अशा प्रकारचा नाट्यप्रयोग सादर करण्याची जबाबदारी सोपवली. यक्षगानाचा तो खेळ विष्णुदासांनीही पाहिलेला असल्याने त्यांच्यावरही यक्षगानाचा प्रभाव पडणे ओघानेच आले. त्यामुळे आपली मराठी लोककला आणि यक्षगान याचा समन्वय साधून त्यांनी सीतास्वयंवराची मांडणी केली आणि पहिला प्रयोग राजांच्या समोर सादर केला.
त्यांनी वर्ष 1843 मध्ये मराठीत सीतास्वयंवर, वर्ष 1853 मध्ये मराठीत इंद्रजित वध, वर्ष 1854 मध्ये हिंदीत राजा गोपीचंद हे लेखन केले. या सर्व नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व्यवस्थाही त्यांनीच केली होती. सीतास्वयंवराचे गीत लेखनही केले होते. रामायणातील विषयांवर दहा नाटके लिहून त्यांचे प्रयोग त्यांनी सांगली संस्थानात केले. त्यांच्या सादरीकरणाची एक विशिष्ट पद्धत होती. \
त्यामध्ये सूत्रधाराकडून मंगलाचरण, नंतर वनचरवेषधारी विदूषकाचा प्रवेश, त्याचे आणि सूत्रधाराचे विनोदी संभाषण, विघ्नहर्त्या गजाननाचे स्तवन, सरस्वतीस्तवन, गजानन व सरस्वती यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर नाटकास प्रारंभ अशी विष्णुदासांच्या नाट्यप्रयोगांची पद्धती होती. मात्र वर्ष 1862 मध्ये त्यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला. भावे यांचे निधन 9 ऑगस्ट 1901 रोजी झाले.
त्यांनी नाटकांसाठी विविध छंदात केलेल्या पद्यरचनांचा उल्लेख “नाट्याख्याने’ असाही करण्यात येतो. त्यांच्या नाटकांचा मुख्य भाषारूप आधार म्हणजे ही पदेच होत. भावे यांची पन्नासांहून अधिक नाट्याख्याने नाट्य कवितासंग्रह या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती विष्णूदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्ष 1960 सालापासून विष्णूदास भावे पुरस्कार देत आली आहे.
सांगली येथील ही संस्था व राज्य मराठी नाट्य परिषद यांच्यातर्फे दरवर्षी “रंगभूमिदिना’ दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप- मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णूदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, 11 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते.