नवी दिल्ली – अयोध्येतील जमीन घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी, असे साकडे कॉंग्रेसने सोमवारी घातले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मौन का बाळगून आहेत, असा सवालही केला.
अयोध्या विकास प्राधिकरणाने बेकायदा प्लॉटिंग करणाऱ्यांची एक यादी जाहीर केली. त्यामध्ये भाजपच्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यावरून कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजपबरोबरच मोदी आणि शहांना घेरण्याचा प्रयत्न केला.
अयोध्येत प्रचंड जमीन घोटाळा सुरू असल्याचे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. घोटाळ्यात भाजपचे नेते सामील आहेत. तसे असूनही मोदी आणि शहा मौन का बाळगून आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.
उत्तरप्रदेशात काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या प्रचारावेळीही कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता राखल्याने तो मुद्दा निष्प्रभ ठरल्याचे मानले गेले.