विदीशा – विदिशा जिल्ह्यातील लाटेरी ग्रामपंचायतीमधील उनरसिकलामध्ये राहणारी 27 वर्षीय गर्भवती महिला सुशीलाबाई “लाडली बहन’ योजनेची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचली असता तिला सांगण्यात आले की, ती जिवंत नसून केव्हाच मरण पावली आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या सुशीलाबाईला “आपण मेलो नसून, जिवंत आहोत’, हे सिद्ध करण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. विशेष म्हणजे असा प्रकार सुशीलाबाईसह अन्य 40 जणांबाबत घडल्याचे उघडकीस आले आहे.
नुकतेच शिवपुरी जिल्ह्यात 26 जिवंत लोकांना मृत घोषित करून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मिळालेली सानुग्रह रक्कम हडपण्याचे प्रकरण घडले होते. हे प्रकरण अजूनही थंडावले नाही तोच विदिशा जिल्ह्यातील कुरवई भागातील खजुरिया जागीर या ग्रामपंचायतीत जिवंत लोकांना मृत घोषित केल्याचे प्रकरण समोर आले आहे. विदिशाच्या ग्रामपंचायत खजुरिया जागीरमधील पंचायतीतील 40 हून अधिक लोक, जे अद्याप जिवंत आणि निरोगी आहेत, त्यांना एसपीआर पोर्टलने मृत घोषित केले आहे.
सुशीलाबाईसह पाच जणांनी आपल्याला मृत घोषित केल्याची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. पोर्टलच्या रेकॉर्डचा शोध घेतला असता पोर्टलवर जिवंत आणि मरण पावलेल्या अशा 40 हून अधिक लोकांची नावे समोर आली आहेत.
लाटेरी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा राजपूत यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्टेशन प्रभारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या एसपीआर पोर्टलवर अज्ञात व्यक्तीने अनधिकृतपणे प्रवेश केला आहे. तसेच पंचायतीच्या डेटामध्ये छेडछाड करून काही जिवंत लोकांना मृत घोषित करण्यात आले.
मध्य प्रदेशात पंचायत सचिव आणि रोजगार सहाय्यक, (जेथे पंचायत सचिव नसतात), यांच्याकडे एसपीआर पोर्टलची सर्व माहिती आहे ज्यात ग्रामपंचायतींचा महत्त्वाचा आयडी पासवर्ड, हा आयडी पासवर्ड आहे. समान की आयडी पासवर्डने असे बदल करता येतात. खजुरिया जहागीरच्या वर्षा राजपूत या सरपंच आणि भाजप महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्षाही आहेत. राजकीय वैमनस्यातून विरोधकांनी केलेला हा हातखंडा असल्याचा आरोप त्यांनी केला असून, यात सरपंचाची भूमिका नाही, असे त्यांनी म्हटले आहे.