मात्र पोहोचण्यापूर्वीच पोलीसानी दाखल केले विलगीकरण कक्षात
बलरामपुर,( उत्तर प्रदेश): सध्या करोना व्हायरस मुळे देशपातळीवर लॉक डाऊन चालू आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुकीस बंदी आहे. मात्र अशा परिस्थितीतही लग्नाची तारीख चुकू नये याकरिता उत्तर प्रदेशातील एका युवकाने तब्बल 850 किलोमीटरचा प्रवास सायकल वरून केला. मात्र लग्न स्थळावर पोहोचण्याअगोदरच पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन त्यांची रवानगी विलगीकरण कक्षात केली असल्याचा प्रकार घडला आहे.
या 24 वर्षीय युवकाचे नाव सोनू कुमार चव्हाण असे आहे. लॉक डाऊन सुरू होण्याअगोदर तो पंजाब मधील लुधियाना येथे काम करीत होता. लग्नाची तारीख चुकू नये यासाठी सोनू आणि त्याच्या तीन मित्रांनी लुधियाना वरून उत्तर प्रदेशातील आपले घर सायकलचा प्रवास करून गाठण्याचा निश्चय केला. हे सर्वजण आठवडाभर दिवस आणि रात्र सायकलवरून प्रवास करीत होते.
सोनूचे घर उत्तर प्रदेशातील नेपाळ नजीक गावात आहे. मात्र 850 किलोमीटर प्रवास केल्यानंतर बलरामपुर येथील पोलिसांनी या सायकलवरुन जाणाऱ्या युवकांना विचारणा केली. त्यांनी झालेला प्रकार सांगितल्यानंतरही या युवकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसाठी पोलिसांनी या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करण्याचा निर्णय घेतला. सोनूचे घर बलरामपुर पासून आणखी 150 किलोमीटर अंतरावर आहे. सोनू आणि त्याचे तीन मित्र लुधियानातील एका फरशीच्या कारखान्यात काम करत होते. जर मला पोलिसांनी प्रवास करून दिला असता तर माझे आतापर्यंत लग्न झाले असते. मी लग्नाचा फार मोठा कार्यक्रम घेणार नव्हता, असे तो म्हणाला.
मात्र पोलिसांनी जाण्यास परवानगी न दिल्यामुळे मी आता विलगीकरण कक्षात उरलेला काळ घालविणार आहे असे सोनूने सांगितले. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल सोनू म्हणाला की मला थोडे वाईट वाटत आहे. मात्र पोलिसांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. बलरामपूरचे पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले की सोनू आणि त्याच्या मित्रांना आम्हाला सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विलगीकरण कक्षात दाखल करावे लागले आहे. 14 दिवसानंतर त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्यास ते त्यांच्या घरी जाऊ शकतील. त्यावेळी देशातील लॉक डाऊनही संपलेले असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.