नवी दिल्ली : (वंदना बर्वे )- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्याच्या निर्णयामागे ‘लॉजिक’ असल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.
मात्र, नरेंद्र मोदी यांनी आज 3 मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविला आहे. यामागे खास ‘लॉजिक’ असल्याची बाब पुढे आली आहे. 1 मे रोजी कामगार दिनाची सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सुटी आहे.
लॉकडाउनचा कालावधी अधिकृतरित्या 30 एप्रिलला संपविला असता तर जवळपास दीड महिन्यांपासून घरात बंद असलेली सव्वाशे कोटी जनता तीन दिवसाच्या सुटींचा आनंद उपभोगण्यासाठी बाहेर पडली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनता एकमेकांच्या संपर्कात आली तर कोरोनाची लागण पुन्हा नव्याने होण्याची शक्यता होती.
हा धोका टाळण्यासाठी पंतप्रधानांनी 3 मे ही तारीख लॉकडाउन संपविण्यासाठी निवडली असल्याची चर्चा आहे. 25 मार्चपासून 21 दिवसासाठी लागू झालेला लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढला आहे. अर्थात लोकांना आता 40 दिवस घरात रहावे लागेल. मात्र, 40 दिवसांच्या कालावधीनंतर तरी कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीच महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची घोषणा त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर आता या राज्यांनाही देशव्यापी लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
देशात कोरोना विषाणू हा चांगलीच डोकेदुखी ठरतानाचे चित्र निर्माण झाले आहे. मागील चोविस तासांत 1 हजार 211 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने दहा हजारी पार केली आहे. यात आतापर्यंत 339 जणांचा मृत्यू झाला आहे.