मुंबई – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या चित्रपटात सिद्धार्थने ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ यांची भूमिका साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 12 ऑगस्ट 2021 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थने पोस्ट शेअर करत लिहिले की, “आयुष्यात एखाद्या अभिनेत्याला फार कमी वेळेला अमर झालेल्या व्यक्तीची भूमिका करण्याची संधी मिळते. नेमकी तशी संधी माझ्या आयुष्यात आली होती. ‘कॅप्टन विक्रम बत्रा’च्या भूमिकेने मला नव्याने जगायला शिकवले. त्यांचे जगण्यातील बारकावे, स्पष्टवक्तेपणा, देशभक्ती, देशाविषयी असणारी तळमळ या प्रत्येक गोष्टी मी शिकत गेलो. या प्रदीर्घ प्रवासानंतर शेरशाह तुमच्यासमोर आला. दोन वर्षापूर्वी याच दिवशी तुम्ही या चित्रपटाला खूप प्रेम दिले होते. जेव्हा जेव्हा या तारखेचा मी विचार करतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येते ते म्हणजे ‘ये दिल मांगे मोर.’
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. हा चित्रपटाची निर्मिती करण जोहरचं प्रोडक्शन हाऊस धर्मा प्रोडक्शनने केली होती. यात सिद्धार्थ मल्होत्रासह कियारा आडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. भारतीय सैन्याचे कॅप्टन विक्रम बत्रा हे 1999मध्ये कारगिल युद्धा दरम्यान शाहिद झाले होते. त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. 1999मध्ये कारगिल युद्धामध्ये दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता.