वीसगाव खोरे, (वार्ताहर) – मानवी जीवनात अंत्यविधी हा महत्त्वाचा संस्कार मानला जातो. या अंत्यविधीसाठी बांबूपासून बनवलेली तिरडी आणि शिकाळे यांचा वापर केला जातो.यामुळे कळतन कळतपणे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत असते.२१ व्या शतकात आपली कर्तव्ये बजावत असताना पर्यावरण राखण्यासाठी पर्यावरणपूरक तिरडी व शिकाळे हा महत्त्वाचा प्रकल्प न राहता तीला चळवळीतचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ही चळवळ उभी करण्यासाठी भोर तालुक्यातील ध्रुव प्रतिष्ठान टिटेघरचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांनी गतवर्षी भोर तालुक्यातील १५५ ग्रामपंचायतींना व वाडी, वस्तींना महत्त्व समजावून सांगून पर्यावरणपूरक तिरडी व शिकाळ्याचे मोफत वाटप प्रांत राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पास जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत जीवनावश्यक गरज म्हणून गावोगावी पर्यावरण पूरक तिरडी आणि शिकाळ्याचा अंत्यविधीसमयी सर्रास वापर होवू लागला आहे. सुरुवातीच्या कालावधीत अंत्यविधीनंतर शिकाळे आणि तिरडी कोठे ठेवायची हा प्रश्न उभा होता. त्याहीपेक्षा या वस्तू गावात कशा आणायचा हा विचार गावकऱ्यांना सतावत होता गावकऱ्यांची मन या गोष्टीला धजावत नव्हते या समस्याला तोंड देण्यासाठी राजीव केळकरांनी आपल्या टिटेघर गावातील हे साहित्य आपल्या घरी ठेवण्यास सुरुवात केली.
तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी लोकांच्या गळी उतरवले. बांबू वाढण्यास किमान तीन वर्षे लागतात. बांबू तोडताना पर्यावरणाची हानी होते. धुव प्रतिष्ठानने पर्यावरणपूरक तिरडी आणि शिकाळे वापरासाठी जनमत अनुकूल करण्यासाठी ग्रामपंचायतींचे सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना भेटीगाठी देऊन पर्यावरणपूरक तिरडी आणि शिकाळे यांचे महत्त्व पटवून दिले. आज तालुक्यातील बहुतांशी गावात पर्यावरणपूरक तिरडी आणि शिकाळ्याचा वापर होत आहे.
स्टीलचे शिकाळे तयार
पारंपरिक तिरडीच्या रचनेनुसार उच्च प्रतीच्या टाकाऊ आणि हलके स्टील वापरून मधल्या पट्ट्यात अंतर कमी ठेवल्याने कडबा लागणार नाही. मृतदेह बांधण्यास व ताण देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. खांदेकऱ्यांना त्रास होणार नाही. तिरडी जमिनीपासून वर राहावी, म्हणून चार बाजूंना टेकू लावले आहेत. तिरडीवर अगरबत्ती वगैरे साहित्य लावण्याची व्यवस्था केली आहे.
बांबू हा वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडच्या समतोलात महत्त्वाचा घटक आहे. बांबूचे ग्रोव्ह झाडांच्या समतुल्य स्टँडपेक्षा ३५% जास्त ऑक्सिजन सोडतात. मातीची झीज कमी होवून मातीतील पोषक तत्वांचा ऱ्हास आणि मातीची धूप जैवविविधता कमी होत दरवर्षी साधारण १० लाख रुपये वाचणार आहे.
त्याच बरोबर हजारो बांबूपासून लाखो हजारो लीटर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. इंटरनॅशनल नेटवर्क फॉर बांबू अँड रॅटनने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की बांबू त्याच भागातील इतर वृक्ष प्रजातींच्या तुलनेत ४ पट जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करू शकतो.
बांबू हा पर्यावरणपूरक झाड आहे. बांबू कापला तरी ४७ वर्षे जगतो, तर इतर वृक्ष हे कापले की संपतात व ते पूर्णपणे विकसित व्हायला शंभर ते सव्वाशे वर्षे घेतात. बांबू एका वर्षात एका एकरातून ८० टन कार्बन डायऑक्साइड हवेतून शोषून घेतो. अपरिपक्व बांबूची तोड थांबल्याने पर्यावरण संतुलित राखण्यास मदत होते. – राजेंद्र कचरे उपविभागीय अधिकारी भोर
साधारणपणे अंत्यविधीला ग्रामीण भागात तिरडी आणि शिकाळ्यासाठी बांबूचा वापर केला जातो. अपरिपक्व बांबू त्यासाठी वापरला जातो तो विनामोबदला दिला जातो. त्यामुळे उत्पन्न काही मिळत नाही. ३ वर्षात बांबू परिपक्व होतो त्याला चांगला दर मिळतो.
अत्यविधीसाठी देण्यात आलेली तिरडी आणि शिकाळे कोठे ठेवायचे या बद्दल गावकऱ्यांना शंका वाटू नये म्हणून टिटेघर गावात आम्ही घरीच तिरडी आणि शिकाळे ठेवतो. त्यामुळे कृतीतून जनजागृती करणे सहज शक्य झाले. – राजीव केळकर, संस्थापक अध्यक्ष, ध्रुव प्रतिष्ठान, टिटेघर (ता.भोर)