नारायणगाव,(वार्ताहर) – पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावर रविवारी (दि. 10) अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी बिबट्या दोन ते तीन दिवस उसाच्या शेतात दोन बिबट्यांसह बसलेला होता. या दोन बिबट्यांमुळे जखमी बिबट्याच्या रेस्न्युला अडचणी येत होत्या. अखेर गुरुवारी (दि. 14) सायंकाळी याच परिसरात ड्रोनद्वारे पाहणी केली असतात जखमी बिबट्यासह ते दोन बिबटेही दिसून न आल्याने ते नैसर्गिक अधिवासात गेले असावेत, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
या अपघातात बिबट्याचे मागील दोन पाय निकामी झाले होते. त्यानंतर जखमी बिबट्या वसंत भुजबळ यांच्या उसाच्या शेतात बसून होता. त्यानंतर सलग तीन दिवस वनविभाग जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार,
वन कर्मचारी खंडू भुजबळ, वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ व ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अपघातानंतर जखमी बिबट्या दोन दिवस परिवारासह उसाच्या शेतात बसून असल्याचे ड्रोनच्या साह्याने दिसून आले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. 14) पुन्हा एकदा उसाच्या सर्यांमध्ये व आजूबाजूच्या मका व ऊस असलेल्या शेतामध्ये ड्रोन फिरविण्यात आला; परंतु जखमी बिबट्या दिसला नाही.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जखमी झालेला बिबट्या व त्याच्यासोबत असणारे दोन बिबटे त्याला नैसर्गिक अधिवासात घेऊन गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला. यावेळी माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे डॉ. चंदन सावने, डॉ. महेंद्र ढोरे, डॉ आदित्य, मदतनीस आकाश डोळस, बाबुराव सावने त्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांनी बिबट्या बद्दलची माहिती उपस्थित नागरिकांना व शेतजमीन मालकांना दिली.