नवी दिल्ली – देशाला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. देशवासियांनी या दोन दुर्गुणांचा द्वेष करण्याची सवय लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्यावरून केलेल्या भाषणात केले. आगामी 25 वर्षात देशाला विकसित देश बनवण्यासाठी “पंच प्राण’ निश्चित करण्याचे आवाहनही त्यांनी देशवासियांना केले.
देशाच्या 76 व्यया स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सातव्यांदा लाल किल्ल्यावरून देशवासियांना उद्देशून भाषण केले. भष्टाचार आणि वशिलेबाजी ही देशाला लागलेली वाळवी आहे, असे सांगून यावेळच्या भाषणात त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणाचे आव्हान देशासमोर असल्याच्या मुद्यावर अधिक भर दिला.
सहकाराच्या संघराज्याबरोबर देशाचे वैविध्य, एकता आणि लैंगिक समानतेच्या मुद्यांबरोबर संशोधन आणि नाविन्यतेच्या मुद्यांनाही त्यांनी स्पर्श केला. आपल्या वर्तनातून महिलांप्रती अनादर व्यक्त होऊ देऊ नये, असे सांगताना संशोधन आणि नाविन्यतेचा पुरस्कार करण्यासाठी “जय अनुसंधान’चा नाराही त्यांनी देशवासियांना दिला.
गेल्या 75 वर्षात देशात राहून गेलेल्या कमतरता दूर करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. त्यासाठी देशाचा विकास, वसाहतवादी मानसिकेच्या सर्व खुणा पुसून टाकणे, आपल्या वारस्याचा अभिमान बाळगणे, एकतेच्या शक्तीवर विश्वास आणि नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची पूर्तता करण्याच्या पाच मुद्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आठवून त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याचे हे वर्ष आहे. राजकीय नेत्यांप्रमाणेच आदिवासी योद्ध्यांचेही याप्रसंगी स्मरण केले पाहिजे. असे सांगून पंतप्रधानांनी या योद्ध्यांना नमन केले.
या स्वातंत्र्य योद्ध्यांनी देशाचे जे स्वप्न पाहिले ते सत्यात उतरवण्यासाठी आगामी 25 वर्षांच्या”अमृत काल’मध्ये देशाच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशात अलिकडच्या काळात सामूहिक चेतना पुनर्जागरण आणि भारताप्रती जगाच्या विचारसरणीत झालेला बदल ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याच्या मुद्यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला.
देशवासीयांनी अनेक दशकांच्या अनुभवानंतर जगाला स्थिर सरकारचे महत्त्व, राजकीय स्थिरतेची ताकद, धोरणे आणि धोरणांवर विश्वास कसा निर्माण होतो हे दाखवून दिले आहे. जगालाही आता ते समजू लागले आहे. “सब का साथ, सब का विकास’ यातून आपण आपली सामूहिक शक्ती आणि सामूहिक क्षमता पाहिली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधण्याच्या मोहिमेद्वारे, साजरा केला जातो आहे. करोना काळात देशाने करोना विरोधी लसींचे 200 कोटी डोस देऊन आदर्श निर्माण केला.
देशाने आता जैव इंधनाचा वापर कहरायचे ठरवले आहे. देशात 2.5 कोटी जनतेला वीज जोडणी आणि नळाद्वारे पाणी पुरवठ्याच्या योजनेची यशस्विताही पंतप्रधानांनी मांडली. देशाच्या शिक्षण धोरणात अमुलाग्र बदल घडवून आणणरे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले आहे, आपले कौशल्य अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबून जाते. हा गुलाम मानसिकतेचा परिणाम आहे. आपल्याला देशातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान असायला पाहिजे. डिजीटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबर नैसर्गिक जीवनपद्धतीचा अभिमान बाळगायला पाहिजे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
एकता आणि एकजूट. आपल्या विशाल देशाचे वैविध्य आपण साजरे करायला हवे. अनेक परंपरा आणि पंथ इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण आपले छोटे शेतकरी, उद्योजक, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग, कुटीर उद्योग, सूक्ष्म उद्योग, रस्त्यावरील विक्रेते, घरगुती मजूर, रोजंदारी मजूर, ऑटो रिक्षा चालक, बस सेवा पुरवठादार इत्यादींची क्षमता ओळखून त्यांना बळकट केले पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य
योगी अरविंदो यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वंदन केले. “स्वदेशी ते स्वराज’ आणि “स्वराज ते सुराज’ अशी हाक देणाऱ्या या महापुरुषाचे स्मरण करायला हवे. हा त्यांचा मंत्र आहे. आणि म्हणूनच “आत्मनिर्भर भारत’ ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. आता संरक्षण दलातही देशांतर्गत निर्मित उत्पादने वापरली जाऊ लागली आहेत.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असो किंवा मोबाईल फोन, आज देश अतिशय वेगाने प्रगती करत आहे. उर्जा क्षेत्रातही देशाला आत्मनिर्भरक व्हायचे आहे. सेमीकंडक्टर विकसित करणे, 5 युगात प्रवेश करणे, ऑप्टिकल फायबर्सचे जाळे पसरवणे अशी ही डिजिटल इंडिया चळवळ केवळ स्वतःला आधुनिक आणि विकसित म्हणून स्थापित करण्यासाठी नाही तर तीन आंतरिक मोहिमांमुळे हे शक्य झाले आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.