मुंबई – स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीवरून राजकारण सुरू झाले असून रेल्वे भाड्याच्या मुद्यावरून विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती केली आहे.
अनिल देशमुख म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. याची मुंबईमध्ये संख्या जास्त आहे. त्या सर्वांना स्वगृही जायचे आहे. केंद्राने ८५ टक्के सवलत दिल्याचे वृत्त होते. मात्र अशा प्रकारचे कोणतेही आदेश रेल्वे विभागाने काढलेले नाहीत. यामुळे सर्व परप्रांतीय कामगारांची परिस्थिती वाईट असूनही स्वतःच्या खिशातून तिकीट खरेदी करावे लागत आहे. म्हणून रेल्वे विभागाने त्यांच्याकडून पैसे घेऊ नये, अशी विनंती त्यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पैशांची चणचण जाणवणाऱ्या मजुरांना रेल्वे प्रवास परवडत नसल्याचे वृत्त आहे. त्यावरून कॉंग्रेस, माकप, नॅशनल कॉन्फरन्स आणि लोकतांत्रिक जनता दल या पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.