पिंपरी – करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रेशन दुकानातून धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता धान्य वाटप करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. याची मुदत 30 जून रोजी संपल्यानंतर 1 जुलैपासून पुन्हा लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी करणे सुरू झाले होते. प्रत्येक लाभार्थ्याचा बायोमेट्रिक मशीनवर थम्ब घेतले जात असल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. ही बाब शहरातील रेशन दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिल्यानंतर याची तातडीने दखल घेत शासनाने बायोमेट्रिक पडताळणीस स्थगिती दिली आहे. त्यामुळे, आता केवळ दुकानदाराने ई-पॉस मशीनला अंगठा लावल्यानंतर धान्य वितरण केले जात आहे.
30 जून रोजी शासनाने दिलेल्या सवलतीची मुदत संपल्यानंतर 1 जुलै रोजी ई-पॉस मशीनवर दुकानदाराच्या थम्बवर होणारे रेशन धान्य वितरण थांबवण्यात आले होते. त्यामुळे, धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्याला स्वत:ची बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतरच धान्य दिले जात होते.
शहरातील रेशन दुकानदार व लाभार्थ्यांनीही बायोमेट्रिक पद्धतीपासून पुढील काही दिवस सवलत मिळण्याची मागणी पुरवठा अधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. ही बाब लाक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आदेश देऊन बायोमेट्रिक पडताळणी न करता धान्य वितरण करण्याचे आदेश बुधवारी रात्री दिले होते. पुन्हा एकदा सवलत दिली असली तरी किती दिवस ही सवलत कायम राहणार आहे. हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेले नाही.