सातारा -शिक्षकांची अर्थवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेमध्ये यंदा प्राथमिक शिक्षक समिती विरुद्ध शिक्षक संघ असा दोन गटातील पारंपरिक सामना होण्याची शक्यता असताना स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीने सुद्धा राजकीय हालचाली वेगवान केल्यामुळे यंदा तिरंगी लढतीचे संकेत मिळत असून राजकीय रंगत निर्माण झाली आहे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने दोन महिन्यांपूर्वीच प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कार्यक्रम पुढे गेला. निवडणूक प्राधिकरणाने पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू केली असून 17 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिक्षक संघ आणि शिक्षक समिती या दोन संघटनांमध्येच सत्तेचा सामना रंगला होता. या निवडणुकीत शिक्षक संघ एकसंघपणे लढल्याने 21 पैकी 17 जागा संघाच्या राहिल्या. चार जागांवर समितीला समाधान मानावे लागले. मात्र, गेल्या पाच वर्षात सत्तेच्या घडामोडीमध्ये बऱ्याच उलट सुलट गोष्टी घडल्या. सदस्यांची फोडाफोडी झाली. संघ आणि समितीच्या संचालकांमध्ये अंतर्गत वाद उफळल्याने प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले.
याचे विदारक दर्शन शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभांमधून वेळोवेळी झाले. गटातटाच्या राजकारणामुळे संघ आणि समिती यांच्यातूनही नाराज होऊन बाहेर पडलेल्यांनी वेगळ्या गटाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आजपर्यंत शिक्षक बॅंकेच्या सत्तेच्या सारीपटात शिक्षक संघ आणि समिती या दोन तगड्या संघटनांमध्ये लढत होत आली. मात्र, बॅंकेच्या इतिहासात प्रथमच स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीने वज्रमूठ आवळली आहे.
या आघाडीचे निमंत्रक गणेश दुबळे यांनी नाराज शिक्षकांना आणि संचालकांना बरोबर घेऊन वेगळा प्रयोग सुरू केल्याने येत्या निवडणुकीच्या राजकीय हालचालीत स्वाभिमानी काय रंगत आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्रित आणून यंदाची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे शिक्षक बॅंकेचे विद्यमान संचालक राजेंद्र घोरपडे यांनी पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन आघाडीचे निमंत्रक गणेश दुबळे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले “बॅंकेला भ्रष्ट कारभारातून मुक्त करण्यासाठी विविध प्राथमिक शिक्षक संघटना एकत्रित आणून बॅंकेत परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने आघाडी स्थापन करण्यात आली आहे.’
संकेतचार नोव्हेंबरला चित्र स्पष्ट होणार
सध्या तरी स्वाभिमानीने स्वतंत्र बाणा ठेवला आहे. संघ आणि समितीला स्वतंत्रपणे आव्हान मिळाल्याने संचालकांमध्ये सुद्धा उत्सुकता निर्माण झाली असून सत्तेचा कौल कोणाला मिळणार याचे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. बॅंकेसाठी एकूण 21 जागा निवडून द्यायच्या असून यामध्ये सर्वसाधारण जागा सोळा, महिला राखीव जागा दोन, अनुसूचित जाती जमातीच्या जागा एक, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्ग एक आणि इतर मागास प्रवर्ग एक असे उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. 4 नोव्हेंबर अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आखाड्यात संघ आणि समिती तसेच स्वाभिमानी यांचे कोणकोणते उमेदवार रिंगणात राहणार आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल.