श्रीनगर – पिपल्स डेमोक्रॅटीक फ्रन्टच्या (पीडीपी) प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या देशविरोधी वक्तव्यांनी नाराज झालेल्या पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी आपला पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला आहे. मुफ्ती यांच्या राष्ट्रविरोधी वक्तव्यांनी आपल्या भावना दुखावल्याचे टी. एस. बाजवा, वेद महाजन आणि हुसेन वफ्फा यांनी मुफ्ती यांना कळवले आहे. हा पीडीपीला मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करुन काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश स्थापन केले. त्यानिमित्ताने कम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटवले. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात, या निर्णयाविरोधी नेत्यांच्या वक्तव्यावरुन दंगली भडकू नयेत म्हणून अनेक नेत्यांना गृहकैदेत ठेवण्यात आले होते.
आपल्या आठ महिन्यांच्या गृहकैदेतून मुक्त झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी त्वरेने गृहकैदेतून मुक्त झालेले आणखी एक नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याशी संधान साधत देशविरोधी वक्तव्ये सुरु केली. त्यामध्ये केंद्र सरकारचा 370 कलम हटवण्याचा, राज्य विभाजनाचा आणि केंद्रशासित प्रदेश निर्मितीचा निर्णय आपल्याला मान्य नसल्याच्या वक्तव्यांचा समावेश होता. यासाठी “गुपकार’ नावाची संस्था/दबाव गट स्थापन करण्यात आला असून त्याच्या प्रमुखपदी अब्दुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुफ्ती यांनी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आपल्याला मान्य नसल्याचे सांगत, ” आझाद काश्मीरचा’ जुनाच झेंडा या आंदोलनाचे प्रतीक म्हणून स्वीकारला असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या अशा सर्व देशविरोधी विधाने आणि कृत्यांचा विरोध करत आपल्या भावना दुखावल्याचे कारन सांगत पीडीपीच्या या तीन नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आज (सोमवारी) जम्मू आणि श्रीनगर येथे “तिरंगा रॅली’ काढून “आता हा सर्व प्रदेश भारताचे अविभाज्य भाग असल्याचा’ संदेश दिला आहे.