आमदार मोहितेंची तक्रार; लघु पाटबंधारेकडून शोधाशोध
चऱ्होली खुर्दतील अहवाल 15 दिवसांत द्या : भूसंपादन उपजिल्हाधिकारी साळुंके यांचे प्रांतांना आदेश
राजगुरूनगर – खेड तालुक्यात एक-दोन नव्हे तर तब्बल तीन पाझर तलाव गायब झाले असून पाझर तलाव चोरीला गेल्याची तक्रार केली असून भूसंपादन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, आमदार मोहिते यांनी चौकशीची मागणी केली आहे.
आळंदी जवळील चऱ्होली खुर्दच्या पाझर तलावाची चौकशी करून अहवाल येत्या 15 दिवसांत देण्याचे आदेश भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंके यांनी खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांना दिले आहेत. या आदेशाच्या पत्रानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाझर तलावांची शोधाशोध सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
चाकण जवळची मेदनकरवाडी, महाळुंगे आणि चऱ्होली खुर्द या गावातील पाझर तलावांचा समावेश आहे. प्रत्यक्षात या तीनही गावांत त्यावेळी आरक्षित संपादन केलेल्या जागेवर तलाव अस्तित्वात नाही. त्यावेळी संपादित जमिनींची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यात आले. याशिवाय निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या.
तलाव पूर्ण होऊन त्याचे मंजुरी प्रमाणे ठेकेदाराला पैसेही देण्यात आले. केवळ संपादनाची नोंद 7/12 वर झाली नाही. त्याचा गैरफायदा घेत अलीकडच्या काळात काही बिल्डर व भाईंनी तलावाचे भराव सपाट करून तसेच पाणी साठवण होणाऱ्या जागेवर भराव करून नंतर या ठिकाणी जागेचे प्लॉटिंग करून विक्री करण्यात आली. त्याद्वारे भरमसाठ माया गोळा करण्यात आली. आजच्या स्थितीला या प्लॉटिंग वर पक्की घरे बांधण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, भूसंपादन (समन्वय) शाखा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चऱ्होली खुर्द पाझर तलावासाठी दि. 1 फेब्रुवारी 1987 मध्ये गट नं 7/12 चे क्षेत्र संपादित झाले असून 7/12 पत्रकी पाझर तलावाच नोंद आहे. या ठिकाणी पाझर तलाव मंजूर होता. पाझर तलावाचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून पाझर तलावाची बिले हे ठेकेदारास अदा करण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्ष पाहता ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाझर तलाव झाल्याचे दिसून येत नाही. या कामामध्ये शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.
खेड तालुक्यातील दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी शासनाने चऱ्होली खुर्द, मेदनकरवाडी, म्हाळुंगे येथे पाझर तलाव केले. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला. पण महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे 7/12 वर संपादनाचे शिक्के पडायचे राहुन गेले. त्रुटी लक्षात घेऊन अधिकारी आणि बिल्डर व काही भाईंनी या जागा शेतकऱ्यांकडूनघेतल्या. दोनदा फायदा होत असल्याने शेतकरी पण तयार झाले. यामध्ये शासनाचा मोठा पैसा लाटण्यात आला आहे. चाकणचे ऐतिहासिक तळे गायब करून ही जागा देखील लाटण्यात आली आहे.
-दिलीप मोहिते, आमदार, खेड
चऱ्होलीतील बिलही अदा
चऱ्होली खुर्द येथे 1987 मध्ये पाझर तलाव झाला होता. त्यासाठी गाव हद्दीतील गट क्र 355 ते 357 तसेच 359 ते 362 हे क्षेत्र संपादित झाले होते. संबंधित पाझर तलावाची रितसर निविदा प्रक्रिया होऊन त्यानंतर पाझर तलाव पूर्ण झाला म्हणून त्यावेळी सुमारे 89 लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. पण या जागेत आजच्या घडीला असा कोणताही पाझर तलाव दिसून येत नाही.
1972 ते 87 मध्ये कोट्यवधींचा खर्च
खेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत म्हणजे 1972 ते 1987 या 15 वर्षांत पाणीटंचाई निवरणासाठी महाराष्ट्र शासनाने माती बांध घालून रोजगार हमी योजनेतून अनेक पाझर तलाव बांधले. काही ठिकाणी पाझर तलाव बांधण्यासाठी भूसंपादन केले होते. त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यात आले होते. तालुक्यात पाझर तलाव बांधण्यासाठी त्या काळी कोट्यवधी रुपये निधी खर्च केला.