बैलांचे लसीकरण करूनच ऊस वाहतूक
पुणे – राज्यातील मागील वर्षी ऊस गाळप हंगाम बराचा कालावधी सुरू होता. या पार्श्वभुमीवर यंदा येत्या 1 ऑक्टोबरला साखर कारखाने सुरू करण्यात येणार आहे. लम्पी स्किन रोगाच्य पार्श्वभूमीवर बैलांचे लसीकरण करूनच त्यांचा ऊस वाहतुकीसाठी वापर करावा लागणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
साखर कारखाने सुरू करण्याबाबत येत्या 16 सप्टेंबरला मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत ऊस वाहतुकीसाठी बैलांचा वापर करण्याबाबत खबरदारी घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात मागील वर्षी एवढाच ऊस गाळपाला येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या समस्या यंदा निर्माण होऊ नयेत यासाठी शासनस्तरावर मंत्रीगटाची बैठक होऊन त्यात योग्य तो निर्णय होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरही तोडगा काढावा लागणार आहे.
राज्यात बहुसंख्य ठिकाणी पावसाचा जोर आहे. हा जोर कायम राहिल्यास साखर कारखाने सुरु करण्याचा मुहूर्त पुढे ढकलावा लागेल. राज्यात एकूण 200 साखर कारखाने आहेत. यातील सर्वच्या सर्व कारखाने पहिल्याच दिवशी सुरू होतील असे निश्चित नाही. टप्प्या टप्प्याने कारखाने सुरू होतील, असे गायकवाड यांनी नमूद केले.
साखर कारखाने सुरु होण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत लसीकरण करुन घेतल्यास लम्पी आजाराचा प्रादुर्भाव निर्माण होणार नाही. दरम्यान काही ठराविक भागातच बैलांचा ऊस वाहतूकीसाठी वापर केला जातो. त्यामुळे ऊस वाहतूक सुरळीत होईल. यात कोणताही अडथळा यायचा नाही, असे गायकवाड यांनी नमूद केले.