नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात लष्करी कोठडीत असलेल्या काश्मीरातील तीन नागरीकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून लष्कराने या तीन जणांच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
२१ डिसेंबर रोजी पूंछमध्ये अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच लष्करी जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर या तीन नागरिकांना लष्कराने चौकशीसाठी उचलले होते. हे तिन्ही नागरीक २७ ते ४२ वयोगटातील आहेत. ते २२ डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळले होते.
या मृतांच्या नातेवाईकांनी आणि राजकीय नेत्यांचा आरोप आहे की या तिघांचा मृत्यू “कस्टडीतील टॉर्चर” मुळे झाला. लष्कराने एकूण आठ जणांना चौकशीसाठी पाचारण करून त्यांना अटक केली होती. त्यातील हे तीन जण आहेत. अजूनही पाच जण लष्कराच्या कस्टडीतच आहेत. मानक कार्यप्रणालीचा एक भाग म्हणून या नागरिकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. जम्मू-काश्मीर पोलीसही या मृत्यूचा तपास करत आहेत.
दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जम्मू काश्मीरातील विविध राजकीय संघटनांनी या घटनेचे तीव्र निषेध केला असून त्याच्या पुर्ण चौकशीची मागणी केली आहे.