रायपूर – छत्तिसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शुक्रवारी ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. सर्व मंत्री सत्तारूढ भाजपचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, प्रथमच आमदार बनलेल्या तिघांची मंत्रिपदी वर्णी लागली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारून भाजपने छत्तिसगढची सत्ता काबीज केली. त्यानंतर मुख्यमंत्री साय यांच्या समवेत अरूण साव आणि विजय शर्मा या दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
निवडणूक निकाल ३ डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर १० दिवसांनी त्यांचा शपथविधी झाला. मात्र, मंत्रिमंडळ रचना अजूनही रखडली होती. अखेर निकालानंतर जवळपास ३ आठवड्यांनी मंत्रिमंडळ रचना मार्गी लागली. त्यानुसार, राज्यपाल बिस्वभूषण हरीचंदन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
प्रथमच आमदार बनूनही मंत्रिपद भुषवण्याची संधी मिळालेल्यांमध्ये ओ.पी.चौधरी, टंकराम वर्मा आणि लक्ष्मी राजवाडे यांचा समावेश आहे. ३१ वर्षीय राजवाडे या छत्तिसगढमधील एकमेव महिला मंत्री ठरल्या आहेत.
नव्या मंत्र्यांच्या समावेशामुळे राज्य मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या १२ इतकी झाली आहे. त्यामध्ये ५ जण प्रथमच आमदार बनले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री प्रथमच विधानसभेवर निवडून गेले आहेत.
छत्तिसगढ मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह एकूण १३ मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे त्या मंत्रिमंडळातील १ मंत्रिपद रिक्त आहे. भाजपने ४ माजी मंत्र्यांना विद्यमान मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे पक्षाने जुन्या-नव्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.