मुंबई – गत अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray ) व राज ठाकरे ( Raj Thackeray ) एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. हे दोघे बंधू एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच एकत्र येतात. पण राजकारणात नेहमीच एकमेकांवर कुरघोडी करतात. आता पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू एका कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. निमित्त होते त्यांच्या भाच्याच्या साखरपुड्याचे.
जयवंती व अभय देशपांडे यांच्या मुलाचा शुक्रवारी मुंबईच्या दादर येथे साखरपुडा पार पडला. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी अवघे ठाकरे कुटुंब एकत्र जमले होते. राज ठाकरे व शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही या सोहळ्याला आले होते. त्यामुळे त्यांचीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच महिन्यांनंतर भेट झाली. हे दोघे बंधू या कार्यक्रमात बराच वेळ एकमेकांशी संवाद साधताना दिसून आले.
गत अनेक वर्षांपासून उद्धव व राज ठाकरे यांनी राजकारणात एकत्र यावे अशी चर्चा रंगली आहे. विशेषतः शिवसेनेतील बंडखोरीनंतर या चर्चेने चागंलाच जोर धरला आहे. पण या दोघांनी नेहमीच त्याला बगल दिली. पण आज हे दोघेही एकाच फ्रेममध्ये आले आणि या दोघांना एकत्र पाहण्याची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली.
उद्धव ठाकरेंनी या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावून भाच्याला व ठाकरेंच्या होणाऱ्या नव्या सुनेला आशीर्वाद दिले. यावेळी त्यांनी आपल्या सर्वच नातेवाईकांची आस्थेवाईकपणे भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यामुळे या सोहळ्यात एक आत्मियतेचे वातावरण पसरले होते.