मुंबई – करोनामुळे स्टेट बॅंकेच्या मुंबई आणि ठाण्यातील तीन शांखा बंद करण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील बॅंकेच्या मुख्य शाखेतील 25 कर्मचाऱ्यांपैकी सात कर्मचाऱ्यांना करोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे ह शाखाच तात्पुरती बंद करण्यात आली आहे. जोगेश्वरी आणि अंधेरीतील शाखाही तेथे काहीं करोना बाधित रूग्ण आढळल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत.
स्टेट बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले की आम्ही बॅंक कर्मचाऱ्यांसाठी जलद प्रतिसाद पथक स्थापन केले असून करोनाचा धोका पत्करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सर्व शक्य ते उपाय केले जात आहे. या स्थितीवर आम्ही सतत लक्ष ठेऊन आहोत असेही त्यांनी नमूद केले. लॉकडाऊनच्या काळातही बॅंकेने ग्राहकांची सेवा अबाधित ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
बॅंकेच्या चर्चगेट, बेलापुर, घाटकोपर बॅंकेतील तीन कर्मचारी करोनामुळे दगावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जात आहे असेही त्यांनी नमूद केले. हा धोका पत्करून काम करणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही सलाम करतो असेही बॅंकेने म्हटले आहे.
दरम्यान करोनाचा धोका असूनही कर्मचाऱ्यांना पुर्ण संख्येने बॅंकेत काम करण्याची सक्ती केली जात असल्याबद्दल काही कर्मचारी प्रतिनिधींनी बॅंक व्यवस्थापनावर नाराजीही व्यक्त केली आहे. विविध बॅंकांमधील 11 कर्मचाऱ्यांचा आत्तापर्यंत करोनाने मृत्यू झाल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.