पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक गावांना होतोय टॅंकरने पाणीपुरवठा
नगर: जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढतच चालली असून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. 517 गावांना सध्या 761 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 12 लाख नागरिकांची 761 टॅंकरने पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जात असून टॅंकरच्या संख्येत मोठ्या प्राणात वाढ होत आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या अत्यंत कमी राहिली. मागील दोन वर्षात जिल्हाभरात राबविण्यात आलेले जलयुक्त शिवार अभियान आणि त्यानंतर गतवर्षीच्या हंगामात झालेला पुरेसा पाऊस यामुळे दुष्काळी गावांची संख्या घटली होती. परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले असून आज अखेर 761 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
अपुऱ्या पावसामुुळे उद्भवलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आज अखेर 2 हजार 797 वाड्या वस्त्यासाठी 761 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असून जिल्ह्यातील सुमारे 12 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे.
सध्या सर्वाधिक टॅंकर पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत. त्याच बरोबर पारनेर तालुक्यासाठी तर कर्जत तालुक्यात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर राहुरी तालुक्यात सर्वाधिक कमी टॅंकर सुरु असून तालुक्यात 2 टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे.
जिल्ह्यातील सुमारे 12 लाख नागरिकांना 761 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असून हे टॅंकर 10 हजार लिटर तर काही 20 हजार लिटर क्षमतेचे असून, नागरिकांसाठी 10 ते 12 लिटर पाणी मिळत असल्याचे चित्र आकडेवारी मध्ये समोर आले आहे. सध्या उन्हाची तिव्रतावाढत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ आहे. त्यामुळे टॅंकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत.
तालुकानिहाय टॅंकर आकडेवारी
संगमनेर तालुक्यातील 42 गावे व 250 वाड्यावस्त्यांवरील 1 लाख 13 हजार 7 नागरिकांसाठी 56 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर अकोले तालुक्यातील 3 गावे व 31 वाड्यावस्त्यांवरील 14 हजार 137 नागरिकांची तहान 7 टंकरने भागवली जात आहे. कोपरगाव तालुक्यातील 15 हजार 14 लोकसंख्यासाठी 10 टॅंकर हे 7 गावे व 54 वाड्यावस्त्यावर फिरत आहे. नेवासा तालुक्यातील 28 गावे व 54 वाड्यावस्त्यासाठी 25 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नगर तालुक्यातील 39 गावे 257 वाड्यावस्त्यावरील 85 हजार 712 नागरिकांची तहान 63 टॅंकरद्वारे भागविली जात आहे. पारनेर तालुक्यातील 1 लाख 81 हजार 429 नागरिकांसाठी 78 गावे व 508 वाड्यावस्त्यावर 125 टॅंकर फिरत आहे. सर्वाधिक पाण्याची मागणी पाथर्डी तालुक्यात असून 146 टॅंकरने पाणी पुरवठा होत असून, या तालुक्यात 106 गावे 588 वाड्यावस्त्या आहेत. शेवगाव तालुक्यातील 46 गावे व 154 वाड्यावस्त्यावर 120 टॅंकरने पाणी पुरवठा होत आहे. या तालुक्यात 71 हजार 836 नागरिकांची तहान भागवली जात आहे. कर्जत व जामखेड व श्रीगोंदा या तालुक्यात मिळून 203 टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.