मुंबई – लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या मनात संभ्रम आहे. सद्य परिस्थितीत शाळा सुरू करणे अवघड आहे. पण शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु कसं करायचं यावर विचार सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने, एखादा चॅनेल घेऊन, मोबाइल कंपन्यांशी बोलून अधिक डेटा देतील येईल का ? अशा अनेक गोष्टींचा विचार सुरु आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शाळेच्या प्रश्नावर माहिती दिली. ठाकरे म्हणाले, काही जणांचे म्हणणे होते की ग्रीन झोनमधील शाळा सुरु करा. पण अशा अर्धवट पद्धतीने नको. वर्गाशिवाय शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. यासाठी मी अनेक तज्ज्ञांशी बोलत आहे. ऑनलाइन शिक्षण मोठे आव्हान असून त्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच शहरातील शाळा सुरु कराव्यात का असा प्रश्न आहे. मी ज्या शाळेत शिकलो तिथे एका बाकावर दोन विद्यार्थी बसायचे. सध्याही अनेक ठिकाणी असेच सुरु आहे. त्यामुळे करोनाच्या अशा परिस्थितीत शाळा सुरू करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.