नवी दिल्ली: मुंबई, दिल्लीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या यामुळे सरकारपुढे पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा इशारा राज्यकर्त्यांकडून देण्यात येतो आहे. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी असा इशारा दिला होता. दिल्ली सरकारही आता असा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉकडाऊनचे चार टप्पे झाल्यानंतर देशभरात अनलॉकचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला. त्यात प्रमुख रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा बंद ठेवल्याने सगळा भार सार्वजनिक बस वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर येऊ लागला आहे.
त्यातून सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा वाजत असून करोना पसरण्याची भीतीच अधिक आहे. जी गत मुंबईची तीच स्थिती दिल्लीत होऊ लागली आहे. त्यामुळे दिल्लीतही लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली.
दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 32 हजारांवर पोहचली आहे. गेल्या 24 तासांत 1500 नवे रुग्ण दिल्लीत आढळून आले. दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे 984 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत गेल्या सात दिवसांत 9500 रुग्ण आढळून आले आहेत.
लॉकडाऊन उठवल्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाखांपेक्षा अधिक रुग्ण असतील असा अंदाज आहे. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं केजरीवाल सरकारला वाटत आहे.