शहरातील नेत्यांमध्ये स्पर्धा
पिंपरी – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट न घेणाऱ्या तसेच पक्षापासून दूर पळणाऱ्या शहरातील स्थानिक नेत्यांची निष्ठा राज्यात सत्ता येताच पुन्हा जागी झाली आहे. विविध पदांच्या स्पर्धेत स्वत:ला ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करणाऱ्या या नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे. काही जणांना महामंडळे तरी काही जणांना विधान परिषदेचे “डोहाळे’ लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 1999 ते 2014 या कालावधीत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. इंदिरा कॉंग्रेसमधल्या नेत्यांची फोडाफोड करून शहरात या पक्षाने चांगलेच बस्तान बसविले होते. मात्र 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा जनाधार कमी होण्यास सुरुवात झाली. 2014 साली शहरात या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. तर त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवरची सत्ताही या पक्षाला गमवावी लागली होती. पक्षांतर्गत दुही, निष्ठावंतांना डावलण्याचा प्रकार, पुढे-मागे फिरणाऱ्यांच्या सांगण्यावरून घेतले जाणारे निर्णय यामुळे गेल्या पाच वर्षांत शहरातून पक्ष हद्दपारीच्या उंबरठ्यावर पोहचला.
त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातून पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार न मिळण्याची नामुष्की या पक्षावर ओढावली. चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटे तर भोसरी विलास लांडे यांना पुरस्कृत करण्याची वेळ या पक्षावर आली. 15 वर्षांच्या कालावधीत अनेक पदे उपभोगत आर्थिक सदृढता मिळविणाऱ्यांनी तिकीट नाकारण्याचे प्रताप केले. चिंचवडमधून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तिकीट न घेता स्वत:ला दूरच ठेवण्याचाच प्रयत्न केला.
प्रशांत शितोळे यांच्या गळ्यात तिकीट मारण्यात आले, मात्र ऐनवेळी एबी फॉर्म पोहचला नाही. माजी आमदार विलास लांडे यांना अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकीटासाठी गळ घालण्यात आली मात्र त्यांनीही अपक्ष म्हणून लढणेच पसंद केले. निवडणुकीपर्यंत पक्षापासून पळ काढणारे मात्र आता राज्यातील सत्तांतरानंतर पक्षाचे आपण कसे निष्ठावान आहोत, याची “आवई’ देताना पहावयास मिळत आहेत. विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना सत्तेतील पदांची ओढ लागली आहे. महामंडळ किंवा विधान परिषदेवर संधी मिळावी यासाठी या नेत्यांनी चालविलेली स्पर्धा शहरात चर्चेचा विषय बनली आहे.
आमदार बनसोडेंना पद मिळणार?
राज्यातील सत्तानाट्यात अजित पवार यांनी केलेले बंड चांगलेच गाजले. या बंडात अजित पवार यांना शेवटपर्यंत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी साथ दिली. अजित पवार यांची पुन्हा पक्षवापसी झाली आहे. त्यांना मानाचे स्थान मिळणार हे देखील स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवारांना शेवटपर्यंत साथ देणारे एकमेव आमदार बनसोडेंना महामंडळाच्या रुपाने बक्षीस मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आझम पानसरे यांचेही पुनर्वसन?
काही वर्षांपूर्वी भाजपवासी झालेल्या आझम पानसरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या व राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना चांगलीच साथ दिली होती. अण्णा बनसोडे यांना मिळालेले मताधिक्य हे पानसरे यांच्या समर्थनामुळेच मिळाल्योच सांगितले जात आहे. त्यातच पानसरे यांचे शरद पवार यांच्याशी असलेले निकटचे संबंध पाहता पानसरे यांचेही राजकीय पुनर्वसन होणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.