मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी पुहा एकदा विक्रांत घोटाळ्या वरून सोमय्यांवर आरोप केले आहेत. आगामी काळात विक्रांत घोटाळा आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षाही मोठे घोटाळे उघड होतील, असे म्हणत राऊतांनी किरीट सोमय्यांवर आरोपांचे टीकास्त्र उगारले आहे. जे स्वतः काचेच्या घरात राहतात, त्यांनी इतरांच्या घरावर दडग भिरकाऊ नयेत, असाही इशाराही संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिला आहे. दरम्यान, आज मुलुंड पोलीस स्थानकात किरीट सोमय्या सहकुटुंब संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, “मला माहीत नाही कोण कुठे तक्रार करायला जातंय? विक्रांत घोटाळ्यावर आरोपी आहेत. विक्रांत प्रकरणात अपहार केल्यामुळे गुन्हा दाखल असून जामीनावर सुटलेले गुन्हेगारा आहेत. त्यामुळे कोणी कुठे जाऊन खोट्या तक्रारी करत असेल, तर काही हरकत नाही. मी आज पुन्हा एकदा सांगितलंय, युवक प्रतिष्ठान नावाचा एक घोटाळा आहे. त्यात काही वर्षांपासून कोट्यवधी रुपये आले आहेत. विवेक बिल्डर्स अनेक कंपन्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.
कोट्यवधी रुपये कसे आले? यामधील अनेक बिल्डर्स आणि कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडलेल्या आहेत. त्यांच्या प्रमुखांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. अशातच या कंपन्यांकडून सोमय्यांच्या खाजगी ट्रस्टला कोट्यवधी रुपये कसे मिळाले? हा काय प्रकार आहे? काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार आहे? धर्मदाय आयुक्त मुंबईचं आर्थिक गुन्हे तपास विभाग यांच्यापर्यंत हा विषय गेला आहे. त्यामुळे कोणाचीही भागमभाग सुरु असेल, तर राहू द्या. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप करता, त्यावेळी तुमच्यावरचे खरे आरोप तुम्ही स्विकारले पाहिजेत. नुसतं आकांतांडव करुन, भोंगे लावून बोंबा मारुन खोटे आरोप, खरे ठरत नाहीत.”असेही राऊत म्हणाले.
“युवक प्रतिष्ठान, विक्रांत घोटाळा याहीपेक्षा त्यांचे मोठे घोटाळे समोर येतील. यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे महाशय खोट्या तक्रारी करत आहेत. हे कसले भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करताय. भ्रष्टाचाराचे मेरुमणी आणि सूत्रधार हेच आहेत. फडणवीस सरकारच्या काळात युवक प्रतिष्ठानला पैसे मिळाले आहेत, विशेषतः केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाचा गैरवापर करुन ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत, याचे सर्व पुरावे आले आहेत. त्यामुळे लवकरच भ्रष्टाचार विरोधी लढण्याचं ढोंग करणाऱ्यांचा मुखवटा महाराष्ट्राच्या जनतेसमोर फाडला जाईल. त्यामुळे उगाच फडफडू नका, तुमचीच पिसं गळणार आहेत.”, असे राऊत म्हणाले आहेत.