नवी दिल्ली : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटावर आपले मत व्यक्त केले आहे. “ज्या लोकांना सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना सत्याची भूक आहे त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट नक्की पहावा, असे मोहन भागवन यांनी म्हटले आहे.
१९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना काश्मीरमधून करावे लागले होते. याविषयीचे कथानक या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाचे दोन गट पडले आहेत. अशावेळी मोहन भागवत यांच्या या वक्तव्याला महत्व वाढले असल्याचे दिसत आहे.
मोहन भागवत यांनी चित्रपटाचे निर्देशक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच चित्रपटाची अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे. चित्रपटासाठी मोहन भागवत यांनी विवेक अग्निहोत्रींना शुभेच्छा देताना, “सत्याच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे. या चित्रपटामधील संवाद उत्तम आहे. त्यामधून पूर्ण कलात्मकता दिसते. यासाठी बरंच संशोधन करण्यात आलंय. त्यामुळेच सत्य काय आहे याची जाण ज्यांना आहे त्यांनी हा चित्रपट आवश्यक पाहिला पाहिजे,” असं म्हटलंय.
११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार या अभिनेत्यांनी महत्वाची भूमिका साकारली. दरम्यान, देशभरात या चित्रपटावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.