मुंबई – गेल्या काही दिवसांपासून तांबे कुटुंबीय आणि थोरात कुटुंबीयांची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष लढत आपला विजय खेचून आणला. यानंतर आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी याबाबत भाष्य केले आहे.
यावर आता अशोक चव्हाण म्हणाले,’बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आत्ताच कळालं असून त्यांचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. आज थोरात यांचा वाढदिवस असून सकाळीच मी त्यांना शुभेच्छा दिल्या. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्व काही करणार आहे,” असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच थोरात पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसून आले, तसेच टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.