केंदूर – येथील थिटेवाडी बंधाऱ्यात 100 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यामुळे पाबळ, केंदूरच्या ग्रामस्थ सुखावले आहेत. अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या केंदूर आणि पाबळ परिसरात थिटेवाडी बंधारा हा एकमेव शेतकऱ्यांसाठी पाण्याचे स्रोत आहे. हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला तरीही केवळ केंदूरचा काही भाग आणि पाबळच्या काही भागाला याचा फायदा होतो.
दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापर्यंतच या बंधाऱ्यातील पाणीसाठा शिल्लक राहतो, मात्र, पुन्हा केंदूर, पाबळ, धामारी परिसरातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. दीड वर्षांपासून बंद पाइपलाइनद्वारे थिटेवाडी बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.
मात्र, त्या कामाला देखील काहीसा “ब्रेक’ लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान थिटेवाडी बंधारा 100 टक्के भरल्यानंतर जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, केंदूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय थिटे यांनी जलपूजन केले.