चिंबळी -करोना व लॉकडाऊनमुळे पुणे-नाशिक महामार्ग वाहतूक कोंडीच्या जाचातून मुक्त झाला होता. मात्र, “अनलॉक’मुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, महामार्ग पुन्हा “कोंडी’त अडकला आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील चाकण, भोसरी रस्त्यावर असलेल्या आळंदी, कुरूळी, चिंबळी या फाट्यांसह मोशी टोलनाक्यापर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. लॉकडाऊननतंर जडमाल वाहतूक तसेच खासगी कंपन्याच्या बसेस तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी जवळपास सर्वच वाहने रस्त्यावर आली आहेत. अवैध वाहतूकदार रस्त्यावर कोठोही रिक्षा आडवी-तिडवी थांबवून प्रवासी घेत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.
पावसामुळे महामार्गाच्या साईडपट्टया एक ते दोन फूट खाली गेल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत वारंवार साईडपट्टया भरण्याबाबत मागणी होत असली तरी संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. एखादा मोठा अपघात किंवा बळी गेल्यानंतर जाग येणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांपैकी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. तसेच नित्याच्या दैनंदिन कामासाठी चाकण एमआयडीसीमध्ये रोज येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही या महामार्गावर जास्त असते.
या रस्त्यावरून छोटामोठ्या वाहनांबरोबरच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याने लहान वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. त्यातच महामार्गाच्या साईडपट्ट्या एक ते दोन फूट खोल गेल्याने व पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने हा महामार्ग नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या साईडपट्ट्या भरण्याची वारंवार मागणी होत असली तरी, संबंधित विभागाकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचे बोलले जात आहे.
सहापदरीचे भिजत घोंगडे
रस्त्याच्या साईडपट्टया फूटभर खचल्या असून छोट्या वाहनधारकांना ऐनवेळेस वाहन खाली घेणे जिकिरीचे होत आहे. रस्ता सहापदरी करण्याचे भिजत घोंगडे अजूनही आहे. किमान साईटपट्टया भरून खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.