मुंबई – यंदाच्या वर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला असून यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे.
तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.देशात यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान 835 मिमी पाऊस होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यान होणाऱ्या पावसाला सामान्य पाऊस म्हटलं जातं.
दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
हा भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज असून पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी वर्तवण्यात येणार आहे. ज्यामुळे मान्सून बाबतचे चित्र आणखी स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.