Sharad Pawar – चार राज्यांतील निकालाचा इंडिया आघाडीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटले आहे.
निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल हाती आल्यानंतर भाजपने हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. त्या विषयी बोलताना पवार म्हणाले की, याचा इंडिया आघाडीवर काही परिणाम होईल असे मला वाटत नाही.
आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेणार आहोत. ज्यांना वास्तविकता माहीत आहे त्यांच्याशी आम्ही बोलू. त्यानंतर आम्ही त्यावर भाष्य करू शकू असे त्यांनी नमूद केले.
सध्याचे मजमोजणीचे ट्रेंड भाजपच्या बाजूने आहेत हे मान्य केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. तेलंगणातील कॉंग्रेसच्या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, पूर्वी, बीआरएस तेलंगणा राखेल असे गृहीत धरले होते.
मात्र, राहुल गांधींच्या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, राज्यात बदल होणार असल्याचे आम्हाला समजले,” असा दावा पवार यांनी केला. शरद पवारांचा गट इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. या आघाडीत देशातील २५ प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग आहे. या पक्षांच्या प्रतिनिधींची लवकरच दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे.