चंदीगढ – करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क अत्यंत उपयुक्त असून त्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क योग्यच आहे. मात्र त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो, कान दुखतात किंवा चष्म्यावर वाप तयार होते त्यामुळे समोरचे धुरकट दिसते अशा तक्रारी असतात.
तथापी, आता त्यावरही उपाय शोधून काढण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे. येथील सेंट्रल सायंटीफीक इन्स्ट्रूमेंट ऑर्गनायझेशनने पॉलीमरचा एक अभिनव मास्क तयार केला असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना तो भेट देण्यात आला.
हा मास्क लावल्यावर करोनाचा विषाणू आत प्रवेश करू शकत नाही, तो धुता येतो तसेच तो पारदर्शी असल्याने मास्क घालणाऱ्याचा चेहराही स्पष्ट दिसतो ही त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. चारीही बाजूंनी हा मास्क बंद असला तरी त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत नाही, तसेच वाफ तयार होत नसल्यामुळे चष्मा घालणाऱ्यांनाही त्याचा त्रास होत नसल्याचे सांगण्यात आले.
त्याच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आल्याचे व सुरूवातीला दीडशे तो दोनशे रूपयांत तो उपलब्ध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.