मुंबई – भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिननिमित्त वर्षा निवासस्थानाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मात्र, आता या ध्वजारोहण समारंभातील फोटोवरुन अॅड. जयश्री पाटील यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. अॅड. जयश्री पाटील यांनी केवळ आरोपच केला नाही तर याविरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
दरम्यान, तक्रारदार जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. त्याबाबत माझा काहीच आक्षेप नाही. मात्र प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नींनी सलामी दिली नाही. त्यांना सविधान मान्य नाही का असा सवाल जयश्री पाटील यांनी उपस्थित केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या,”सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे भारतीय नागरिकांच्या भावनांचा सार्वजनिकरित्या अपमान केल्यासारखं आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा”