मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारकडून नव्याने पारित केलेले कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी देशवासीयांची माफी मागत शेतकऱ्यांना आपल्या घरी परतण्याचे आवाहन केलेले आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या या घोषणेवर देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया देत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
“दीर्घ काळापासून हे आंदोलन सुरु होतं. येत्या 25 तारखेला या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. अखेर सत्याचा विजय झाला. ज्या पद्धतीने आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे रेटलेलं होतं, शेतकरी घर दार सोडून सत्याग्रह करत होते, या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या आंदोलनात हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न झाला. तरीही शेतकरी आपल्या मुद्यावर ठाम राहिले”, असे शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
“हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय आहे. पंतप्रधानांनी उशिरा का होईना हा निर्णय जाहीर केला, मी त्याचं स्वागत करतो. शेवटी देश सर्वांना सोबत घेऊन चालवायचा आहे. समाजातील कोणीही एक घटक नाराज राहिला तर समाजात अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे मी या निर्णयाचं स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.