मुंबई – कृषी, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांवर भर देणारा राज्याचा सन 2022-23 चा अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सन 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील तरतुदींचे जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे.
अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेली भरीव तरतूद अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात येत्या वर्षभरात 104 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्पासाठी सुमारे 840 कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद विदर्भाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असे जलसंपदा मंत्री म्हणाले.
कोयना, जायकवाडी आणि गोसीखुर्द धरणाच्या जलाशयात जलपर्यटन प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या भागातील रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आहे. महिलांच्या आरोग्यासाठी राज्यातील सोळा जिल्ह्यात शंभर खाटांची महिला रुग्णालये उभारण्याचा निर्णय झाला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी करण्यात आलेली तरतूद गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मनुष्यबळ विकासासाठी इनोव्हेशन हब उभारणीसाठी पाचशे कोटी आणि स्टार्ट अप फंडसाठी शंभर कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद स्वागतार्ह असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.
पर्यटनाच्या विकासासाठी नवीन प्रकल्पांची सुरूवात करण्याचा संकल्प महत्त्वाचा आहे. पुणे वन विभागातील बिबट्या सफारी आणि बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा उद्यानातील आफ्रिकन सफारी सुरू करण्याचा मानस चांगला आहे, असेही ते म्हणाले.
कृषीसाठी करण्यात आलेली तरतूद शेती आणि संलग्न क्षेत्राला चालना देणारी ठरेल. येत्या वर्षभरात साठ हजार वीज पंपांना जोडण्या देण्याचे करण्यात आलेले नियोजन शाश्वत सिंचनासाठी अतिशय महत्त्वाचे ठरेल. ग्राम विकास आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद निश्चितच चांगली आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
दळणवळणाच्या सुविधा विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या अर्थसंकल्पात रस्ते, रेल्वे, मेट्रो विकासासाठी करण्यात आलेली तरतूद राज्यातील प्रगतीला चालना देईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.