आळंदी – माऊली मंदिरात पूर्वीप्रमाणेच समाधीचे स्पर्श दर्शन, महापूजा, अभिषेक व मंदिरात असणारे सर्व दरवाजे खुले करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील करोना परिस्थिती पूर्णपणे निवळल्याने बुधवारी (दि. 2) शासनाने पुण्यासह 14 जिल्ह्यातील निर्बंध उठवले आहेत. त्यामध्ये चित्रपट गृह, नाट्यग्रह, धार्मिक आणि पर्यटन स्थळे 100 टक्के खुली करण्याचे आदेश जाहीर केले आहेत;
मात्र गेली दोन-अडीच वर्षांपासून करणामुळे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे महाद्वार भाविकांच्या पूजा, अभिषेक आणि समाधी स्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते, त्यामुळे भाविकांना बरोबरच पुजारी व्यापारी वर्गाचे फार मोठे नुकसान झाले होते. याकरिता येथील माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नगरपरिषद, पोलीस ठाणे आदी ठिकाणी निवेदन दिले आहे.
त्याचबरोबर मंदिर व परिसरातील असणारे अडथळे म्हणजेच बॅंक ऑफ महाराष्ट्र जवळ लावल्या जाणाऱ्या दुचाकी महाद्वार चौकात लावली जाणारे सर्व प्रकारची लहान-मोठी वाहने व मंदिर परिसरात असणारे अतिक्रमणे याकडे संबंधित सर्व विभागाने लक्ष घालून या समस्या दूर कराव्यात असेही निवेदनात म्हटले आहे, त्यासाठी देवस्थानचा सुरक्षा रक्षक किंवा पोलीस प्रशासनाचे दोन कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येतील त्या वेळेस सर्व काही पूर्वीप्रमाणेच सुरुळीत करण्यात येईल, आता आम्ही फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत.
– माऊली वीर, प्रमुख व्यवस्थापक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी