मुंबई – महाराष्ट्रात करोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. बाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आम्हाला कडक निर्बंध लादावे लागतील. या निर्बधांची अंमलबजावणी संबंधित यंत्रणा आणि तुम्हा आम्हालाच करावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
उद्या दुपारी 12.00वाजता माझ्या उपस्थित सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी,सर्व कुलगुरू यांच्या समवेत कोविड 19 च्या परिस्थितीचा आढावा होणार आहे.शैक्षणिक पुढील धोरण काय असावे ह्याबाबत देखील चर्चा होणार आहे.विभागाचे प्रधान सचिव व संचालक देखील उपस्थित असतील, बैठक ऑनलाईन होणार आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 3, 2022
यातच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दुपारी 12 वाजता राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरु आणि शिक्षण विभागाच्या अधिकारी, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
उदय सामंत या बैठकीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोरोनाची स्थिती आणि इतर बाबींची माहिती घेतील. आजच्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय सुरु ठेवायची की नाही यासदंर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं कळत आहे.
दरम्यान, देशात करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यानंतर आता कोविड-19 ची तिसरी लाट देशात दाखल झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 37 हजार 379 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 124 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यानंतर देशात कोविड-19 चे एकूण रुग्ण 3 कोटी 49 लाख 60 हजार 261 वर पोहोचले आहेत. तर त्याचवेळी या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 82 हजार 14 वर पोहोचली आहे.