करोनाने सगळ्यांनाच बेजार करून टाकले आहे. सगळेच हवालदील झाले आहेत. स्थानिक रहिवासी रडत-कुढत कसेतरी दिवस ढकलत आहेत तरी. मात्र या सकंटाने स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. त्यांना करोनाने होणाऱ्या मृत्यूपेक्षा भुकेने होणाऱ्या मृत्यूचे भय अधिक वाटते आहे. यावरूनच त्यांच्या मनोस्थितीची कल्पना येते. पहिला लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत होता. तोपर्यंत त्यांनी धैर्याने सामना केला. आज काहीतरी सकारात्मक घोषणा होईल अशी त्यांना तेव्हा अपेक्षा होती. आपल्या राज्यात, आपल्या गावी, आपल्या लोकांत जाता येईल अशी उमेद मनात जागली होती. मात्र पुन्हा लॉकडाउनला मुदतवाढ देण्यात आली. तेव्हा त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि ते रस्त्यावर धावले.
मुंबईत वांद्रे येथील घटना सगळ्यांनी टीव्हीवर पाहिली. मात्र ठाणे, दिल्ली, सूरत आदी शहरांतही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. राज्य सरकारे घोषणा करत आहेत. मजुरांनी, कामगारांनी घाबरून जाउ नये, त्यांच्या राहण्या-खाण्याची योग्य ती काळजी घेतली जाईल असे सांगितले जात आहे. मात्र चित्र तसेच आहे का, हा प्रश्न आहे. सरकारी घोषणा बऱ्याच असल्या तरी अंमलबजावणीच्या पातळीवर त्या गांभीर्याने पाळल्या जात आहेत का, हाही प्रश्न आहे. सूरतमध्ये सरकारतर्फे दोन वेळच्या जेवणाची मजुरांना ग्वाही देण्यात आली होती. जेवण एकवेळच मिळतेय, तेही पुरेसे नाही. अशा काळात निकृष्ट अन्नाचे सेवन केल्यावर त्याचे परिणाम होतील ते वेगळेच. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असताना तेथील परप्रांतीय कामगारांचा उद्रेक झाला. दोनदा नव्हे, तीनदा त्यांनी गोंधळ घातला. हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला.
मनोदशा समजून घ्या
डोळ्यांत नवी स्वप्ने घेउन हे असंख्य कामगार आज वेगवेगळ्या राज्यांत आले आहेत. आपले राज्य, गाव, परिवार यापासून ते हजारो किमी दूर आहेत. आज त्यांचा रोजगार बुडाला आहे. ते जेथे काम करतात तेथे टाळे लागले आहे. टाळे कधी खुलणार, खुलणार की नाही, याची काहीच शाश्वती नाही. पैसे नाहीत, खायला अन्न नाही, बाहेर जायला मार्ग नाही, अशी त्यांची दशा. माणूस भावूक होतो, तेव्हा सरकारी दिलासा नाही, तर आपल्या माणसांचा भावनिक आधार सगळ्यांना हवा असतो. तोही सध्या त्यांच्या जवळ नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. दुसरी टाळेबंदी जाहीर झाल्यावर पोटात जेमतेम अन्न असतानाच आणि पुन्हा काही मिळण्याची हमी नसताना अनेकांनी चालतच आपल्या घराचा रस्ता धरला. साठ- सत्तर किमी चालत गेल्यावर यातील बहूतेक जणांना आहे तेथेच किंवा जेथून निघाले होते, तेथेच परत आणण्यात आले.
अवघड काळ
देशात आज जे काही घडतेय ते अभूतपूर्व आहे. आज हयात असलेल्या सगळ्यांत ज्येष्ठ व्यक्तीनेही त्याच्या आयुष्यात अशा संकटाचा सामना करणे तर दूरच, असे काही ऐकलेही नसेल. सगळ्यांचेच मन घट्ट नसते. यामुळे सगळ्यांना विश्वासात घेउन आणि सगळ्यांच्या अस्वस्थतेवर फुंकर घालून त्यांच्या मनावरीलत भुकेचे, कुटुंबाच्या काळजीचे, भविष्याच्या चिंतेचे दडपण दूर करावे लागणार आहे. असामान्य स्थिती आहे. असामान्य स्थितीत निर्णयही असामान्य घ्यावे लागतात. ते पूर्ण दिलासा देणारे भलेही ठरत नसतील पण निदान आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी खटपट करते आहे, याची जाणीव जरी अस्वस्थ नागरिकांना झाली तर ते पूर्ण ताकदीने साथ देण्याचा प्रयत्न करतात. तशी उमेद त्यांच्या मनात जागवावी लागेल. लोकांना धान्यवाटप आणि किटवाटप करावेच. मात्र त्याही पलिकडे त्यांना उभारी देण्याचा प्रयत्नही सर्व पातळीवर केला जावा.