मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले गेले असून, महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. यानंतर परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले होते.
मात्र, आता परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावरील आरोपही मागे घेण्यात आले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन मागे घेतले असून निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी मानला जावा असे देखील सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. यावेळी ते म्हणाले, “कॅटने अहवाल दिला आहे. कॅटने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांची डी देखील बेकायदेशीर ठरवली आहे. त्यांचे निलंबन देखील कॅटने रद्द केले आहे. आम्ही फक्त या निर्णयाची अमलबजावणी केली आहे. असं फडणवीस म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.