नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना कुणीच गांभीर्याने घेत नाही. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते हास्याचा विषय ठरत आहेत, असे टीकास्त्र केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनी सोडले.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना प्रधान यांनी राहुल आणि कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. राहुल यांना त्यांचा पक्षच गांभीर्याने घेत नाही. जनता कशी काय घेईल? लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांत जनमताचे प्रतिबिंब उमटले.
आगामी निवडणुकीत कॉंग्रेसची स्थिती आणखीच खालावेल, असा दावा त्यांनी केला. केंद्रात कॉंग्रेसची सत्ता आल्यास शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी दिली जाईल, असे आश्वासन राहुल यांनी नुकतेच दिले.
त्याविषयीच्या प्रश्नावरून प्रधान यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. याआधी केंद्रात सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केले? अलिकडेच कॉंग्रेसने विजय मिळवलेल्या कर्नाटकसारख्या राज्यांत तो पक्ष काय करत आहे? निवडणुकांवेळी दिलेली आश्वासने कॉंग्रेसने पूर्ण केली का, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.