नवी दिल्ली, – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला गेलेले आमदार परत येतील. हे बंडखोर परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. या सगळ्यांना मदत करणारे जे पक्ष आहेत. त्यांची भूमिका महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे पाठिंबा देण्याची आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नवी दिल्ली येथे विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. शरद पवार म्हणाले, राष्ट्रपतींची निवडणूक असल्यामुळे मी येथे आलो आहे. महाराष्ट्रात ज्यापद्धतीने परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा निकाल हा दिल्लीत नाही तर राज्यात घ्यायचा आहे. शिवसेनेचा एक गट हा आसाममध्ये गेला आहे. त्यांच्याकडून एक स्टेटमेंट समोर आले आहे. या स्टेटमेंटमधून त्यांना सत्ता परिवर्तवन हवे आहे. सत्ता परिवर्तनासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे.
तसेच आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.
…तर भाजपला फायदा काय?
जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढे केले त्याचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम ही दोन राज्ये निवडली आहेत त्या राज्यांत भाजपचे सरकार आहे. बंडखोरांकडे संख्याबळ असेल तर ते गुवाहटीत का थांबले आहेत? असे शरद पवार म्हणाले.