मुंबई – मागच्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नजराजी नाट्य सुरु झाले आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आता काँग्रेस पक्षामधून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे काही आमदार सरकारवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभुमीवर आमदार थेट हायकमांड म्हणजे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे मंत्री असून देखील त्यांच्याकडून कामे लवकर होत नसल्याबाबत आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराज आमदारांची संख्या जवळपास २५ असल्याची देखील चर्चा सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही आमदार मंडळी दिल्लीला एका प्रशिक्षणासाठी जाणार असून तेव्हाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे सांगितले जात आहे.
सत्ता स्थापन झाल्यानंतर काही महिन्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांमध्ये बोलताना ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, नंतर चर्चेतून नाराजी दूर झाली असून मतभेद असले तरी मनभेद नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे नाराजीनाट्य सुरू होण्याची चिन्ह दिसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्या सोबत होणाऱ्या चर्चेतून काय पुढे येणार हे पाहणे गरजेचे आहे.