नवी दिल्ली – सध्या सुरू असलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकर गुंडाळण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले.
संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यासंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. अशा संदर्भातील कोणताही प्रस्ताव विरोधकांकडूनही आलेला नाही.
सरकारने जी विधेयके या अधिवेशनामध्ये मंजूर करायचे ठरवले आहे अथवा ज्या अध्यादेशांचे रूपांतर मंजूर केलेल्या विधेयकांमध्ये करून घ्यायचे आहे, त्याबाबत सरकारचे प्रयत्न असणार आहेत, असेही जोशी यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे.
पावसाळी अधिवेशन सरकार गुंडाळण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर जोशी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.