राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली : कोविड -19 या आजारामुळे परंपरागत कामावर आणि कामाच्या पद्धतीवर बदल झाल्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. असे असले तरी बऱ्याच क्षेत्रांत नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचे राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष कुमार यांनी म्हटले आहे.
कौशल्य विकास या विषयावरील परिसंवादात बोलताना कुमार म्हणाले की, वाहतूक, बॅंकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्या आहेत. परंपरागत तंत्रज्ञानाच्या आधारावर असलेल्या कामावर परिणाम झाला आहे. मात्र, या काळामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बरीच कामे झाली आहेत. आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावरील नवी कौशल्य उपयोगात येणार आहेत.
त्यामुळे या नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचे कुमार म्हणाले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, तरीही भारतामध्ये कुठल्याही वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. त्यामुळे मोठ्या शहरालगतच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम निर्माण झाले आहे. यासंबंधातील कौशल्य आत्मसात केल्यानंतर तरुणांना या क्षेत्रात रोजगार मिळू शकेल.